शालेय जीवन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक – वृषाली करोसिया
नगर – शैक्षणिक जीवनातील 10 वी आणि 12 वी हे सर्वात महत्वाचे टप्पे आहेत. या परिक्षेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश त्याच्या करिअरची पुढील दिशा ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करुन परिक्षेला सामोरे गेले पाहिजे. शिक्षकांची तुमचे भविष्य घडविण्यासाठीच धडपड असते. आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे, त्यादृष्टीने तुम्हाला तयार केले आहे. 12 वी नंतर करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे आपल्यातील क्षमता ओळखून त्यादृष्टीने तयारी केली पाहिजे. स्पर्धा परिक्षांमधून आपण अधिकारी होऊ शकता. शिक्षकांनी केलेले आणि शाळेच्या दिवसांतील आठवणी या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन मंडल अधिकारी सौ.वृषाली करोसिया यांनी केले.
श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल संलग्न महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात गर्व्हमेंट कॉन्ट्रक्टर सचिन ढवळे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंडल अधिकारी सौ.वृषाली करोसिया, संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अॅड.विजय मुनोत, मनसुखलाल पिपाडा, सचिन डागा, प्राथ.मुख्याध्यापिका योगिता गांधी, माध्य. मुख्याध्यापिका कांचन गावडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सचिन ढवळे म्हणाले, भविष्यात तुम्हाला काय व्हायचे हे शाळेतील शिक्षणावरुन ठरत असते. नेहमी उच्च ध्येय ठेवून त्यादृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनतीची तयारी ठेवा. 12 वी महत्वाचा टप्पा असल्याने यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी उपाध्यक्ष दशरथ खोसे म्हणाले, संस्थेतील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरि प्रयत्न केले जात आहे. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थीही चांगले यश मिळवत असल्याचा संस्थेला अभिमान आहे.
यावेळी अॅड.विजय मुनोत म्हणाले की, इ.12 वी कला,वाणिज्य व विज्ञान या शाखेमध्ये विद्यार्थ्यांना आपले करिअर घडविण्याची उत्तम संधी आहे, कोणतीही शाखा कमी समजण्याचे कारण नाही. या तिन्ही शाखेचे महत्व विषद करतांना विद्यार्थ्यांनी आपआपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यात बेस्ट व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी राजेश झालानी म्हणाले, 12वीचे वर्ष जीवनाला आकार देणारे वर्ष आहे. विद्यार्थ्यांनी एकग्रतेने अभ्यास करणे गरजेचे आहे. 100 टक्के निकाल लावून संस्थेचा लौकिक कायम ठेवावा.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविका कांचन गावडे यांनी केले तर सूत्रसंचालन उमादेवी राऊत यांनी केले. शेवटी सुभाष चिंधे यांनी आभार मानले.