पुरस्कार वितरण : समाजसेविका ममताताई सपकाळ यांचे प्रतिपादन
अहमदनगर : स्पर्श सेवाभावी संस्था स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा व भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम करत आहे, तसेच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिथे शब्द संपतात तेथे स्पर्श काम करतो, या हेतुनेच संस्था कार्य करत आहे, असे प्रतिपादन समाजसेविका ममताताई सपकाळ यांनी केले. नगर तालुक्यातील वडारवाडी येथील स्पर्श सेवाभावी संथेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक संस्था, उद्योग, कृषी, ऐतिहासिक , सामाज सेवक इत्यादी १९ क्षेत्रातील ४० जणांना मानपत्र, पदक व स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्ष शुभांगी पाटील, डॉ. सारिका बांगर, न्यास नोंदणी कार्यालयाच्या रुपाली गीते, पोस्टल संघटनेचे संतोष यादव, बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंभे, माहेर संस्थेच्या सुप्रिया मंडलिक, संजय पठाडे, मौलाना रियाज अहमद साहब, विनय सपकाळ, शरद झाेडगे, मोहसीन पठाण, सुप्रिया मंडलिक आदी उपस्थित होते. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्ष शुभांगी पाटील म्हणाल्या, समाजातील दुर्लक्षित महिला व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्था काम करत आहे. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार अमोल आल्हाट, उपाध्यक्ष मीनाक्षी आल्हाट उपस्थित होत्या. प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा शितल साळवे यांनी, सूत्रसंचालन शिक्षिका शुभांगी अमोलिक, उषा तांबे यांनी, तर आभार संस्थेचे संस्थापक सचिव प्रविण साळवे यांनी मानले , कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी शिक्षिका सुजाता अंगारखे, केअर टेकर सुनिता बोराडे, कविता हजारे यांनी परिश्रम घेतले.